२२ मिनिटांतच पहलगामचा बदला : मोदी   

बिकानेर : २२ एप्रिलला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला २२ मिनिटांत घेत दहशतवाद्यांच्या नऊ सर्वात मोठ्या तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. जगाने आणि देशाच्या इतर शत्रूंनी देखील पाहिले, की जेव्हा सिंदूर दारूगोळा बनतो तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर बाबात बोलताना व्यक्त केल्या.  
 
पंतप्रधान मोदी यांनी गुरूवारी राजस्तानातील बिकानेर जिल्ह्यातील करणी माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी बिकानेर येथे रेल्वे, रस्ते, वीज, पाणी आणि इतर अनेक विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी ते बोलत होते. 
 
मोदी म्हणाले, २२ एप्रिलला पहलगाम येथे जो गोळीबार झाला. यानंतर प्रत्येक देशावासीयांनी एकत्र येत संकल्प केला होता, की दहशतवादाला संपवून टाकू. त्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देऊ. देशाच्या लष्कराच्या शौर्याने आज आपण ती प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. आमच्या सरकारने तीनही सेना दलांना पूर्णपणे मोकळीक दिली होती. तिन्ही सेना दलांनी मिळून असे चक्रव्यूह रचले, की पाकिस्तानला गुडगे टेकण्यास भाग पाडण्यात आले.
बोलणी फक्त व्याप्त काश्मीरबद्दलच 
 
पाकिस्तानचा रहीमयार खान एअरबेस आयसीयूमध्ये पडला आहे, तो कधी उघडला जाईल माहिती नाही. पाकिस्तानबरोबर ना व्यापार होणार ना चर्चा, बोलणी होतील पण ती फक्त व्याप्त काश्मीरबद्दलच. 
 

Related Articles